मीरा रोड म्हाडा कॉलनीतील एसटीपी प्लांटला स्थानिक रहिवाशियांचा विरोध
मीरा रोड :- मीरा रोडच्या म्हाडा कॉलनीतील शेकडो स्थानिक रहिवाशांनी एसटीपी प्लांट (सांडपाणी केंद्र) विरोधात धरणे आंदोलन केले. एसटीपी प्लांटमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्यांचे जगणे कठीण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मिथेन, हायड्रोजन सल्फाईट, अमोनिया, हवेतून पसरलेले जीवाश्म, एसटीपी प्लांट ची दूषित वायू यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.
गेल्या 3 वर्षांपासून बंद असलेला एसटीपी प्लांट पुन्हा सुरू करण्यात आला, त्याविरोधात नागरिकांनी आंदोलन केले. या एसटीपी प्लांटजवळील 12 सोसायट्यांमधील 1236 घरांतील सुमारे 7000 नागरिकांना जटील समस्यांचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यात आली. सोमवारी सकाळपासूनच एसटीपी प्लांटजवळ (मल निसारण केंद्र) नागरिकांची गर्दी होऊ लागली.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाचा परिणाम झाला आणि महापालिका आयुक्त दिलीप ढोले, डीसीपी अमित काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे आणि सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात आयुक्त दिलीप ढोले यांनी १५ दिवसांचा अवधी मागून आयआयटीच्या अभियंत्यांची चौकशी करून जनतेचे प्रश्न सोडवू, असे सांगितले.
अंकुश मालुसरे यांनी हे आंदोलन १५ दिवसांसाठी स्थगित करण्यात येणार असून, त्यानंतरही तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात आलेले स्थानिक नगरसेवक राजू भोईर यांची स्थानिकांनी जोरदार खरडपट्टी काढली.
2019 मध्ये या एसटीपी प्लांटच्या साफसफाईदरम्यान 3 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता, तेव्हापासून हा प्लांट बंद होता. पण 3 महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू झाले.





Comments
Post a Comment